Skip to content

५: गुन्हेगारी जगताची खळबळ

जेव्हा इन्स्पे० ज्योतिप्रसाद आणि त्रिकूट या विचित्र खुनाबद्दल कीस काढत बसले होते, नेमक्या त्याच वेळी हॉटेल रिट्झमध्ये एक भयानक चौकट जमली होती.

रिट्झ हॉटेलच्या डायनिंग हॉलच्या उजव्या कोपऱ्यात शेवटच्या टेबलावर चार जण अगदी बारीक आवाजात बोलत बसले होते. चौघांचेही पोशाख भपकेबाज असले तरी त्यातले दोनच जण जरा सभ्य वाटत होते. त्या दोघांतील पहिला होता अ‍ॅडव्होकेट राजसिंह. त्याने बदामी रंगाचा सूट घातला होता आणि त्याच रंगाची गडद टाय गळ्याभोवती आवळली होती. कोटाच्या वरच्या खिशात त्याच रंगाचा रुमाल खोवला होता. हा राजसिंह त्या चौघांत उठून दिसत होता.

दुसरा होता डॉक्टर माजगे. सूट नसला तरी तो अप-टु-डेट होता. त्याने केस वाढवले होते आणि रात्रीची वेळ असूनही डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा, डार्क काचांचा गॉगल होता. बहुधा तो नंबरचा चष्मा असावा. हा डॉक्टर वारंवार डोळ्यांवरचा गॉगल काढून खिशातल्या रुमालाने पुसत होता. ही त्याची नेहमीची सवय असावी.

त्याच्यासमोर दोघे बसले होते. पहिला होता बच्चन. शाम बच्चन! हे जबरदस्त पात्र होते. हा किमान दहा-बारा वेळा येरवड्याची हवा खाऊन आला होता, आणि तीस वर्षे वयाचा शाम बच्चन त्यामुळेच वयस्कर वाटू लागला होता. जेलमधे त्याची गोरी कातडी रापली होती. गालावर आणि भिवयांजवळ जखमांच्या लांब खुणा होत्या. शाम बच्चनच्या प्रतापाच्याच त्या खुणा दिसत होत्या.

शाम बच्चनच्या शेजारी बसला होता शंभू भोसले. देहाने कमालीचा राकट आणि चेहरासुद्धा तितकाच राकट. हा बच्चनपेक्षा काकणभर सरसच होता, पण फरक इतकाच की त्याने अजून जेलची हवा चाखली नव्हती.

खाताना सर्व शांत होते आणि सारखे दाराकडे पाहत होते. ते कुणाची तरी वाट पाहत असावेत.

“बच्चन…तो बघ आला.”

मान न वळवता डोळ्यांच्या कोपऱ्यांमधून सर्वांनी प्रवेशद्वाराकडे पाहिले. उंच, धिप्पाड देहाचा एक तरुण घाईघाईत आत आला. कुठेही न पाहता तो सरळ चौघे बसलेल्या टेबलाजवळ आला आणि खुर्ची ओढ्न बसला.

“राज, मालीचा खून झाला,” तो बोलला.

बोलता बोलता त्याने कोटाच्या खिशातला पाईप काढून त्यात तंबाखू भरायला सुरूवात केली. आपल्या बोलण्याचा चौघांवर काय परिणाम झाला होता हे मान वर करून पाहण्याचीही त्याने तसदी घेतली नाही. चौघे मात्र वेड्यासारखे त्याच्याकडे पाहत होते, जणू इतका जबरदस्त धक्का त्यांना कधीच बसला नव्हता. त्याची पाईपमध्ये तंबाखू भरून झाली.

“तीरखां, तुला कशासाठी पाठवले होते?” राजसिंह बोलला. त्याच्या चेहऱ्यावर रागाच्या छटा उमटल्या होत्या.

“हो… पण तू मला पाठवलंस दादरच्या तिच्या ब्लॉकवर. राज, मालीला रस्त्यातच गाठलं होतं. क्रॉस लेनच्या बोळात तिचा खून झाला. सकाळीच मला ती बातमी समजली.”

“आणि तू आत्ता सांगतोयस?”

“हो… राज, तू चिडलास तरी मला पर्वा नाही.” पाइपातून धुराचे भपकारे उडवत नवीन आलेला तीरखां शांतपणे दम खेचत होता. त्याच्या चेहऱ्यात कसलाही बदल झाला नव्हता. “तुला कल्पनासुद्धा येणार नाही इतक्या चमत्कारिक हत्याराने तिचा खून झालाय.”

“झालाय ना पण? आता पुढे काय?” राजसिंह आता निवळला होता.

“पैसे…?”

“हो… तीरखां, तू ब्लॉकमध्ये शिरला होतास?”

“हो. पैसे तिथे नाहीत. मी सर्व सामानाची तपासणी केली.”

“मग पैसे गेले कुठे?”

“होस्टेलवर ठेवले असण्याची शक्यता आहे.”

“नाही तीरखां, रक्कम ब्लॉकवर हलवताना मी स्वतः हजर होतो.”

“तुला काय म्हणायचंय?”

“तीरखां, तू नजर वर कर आधी.”

“का?” रागाने तीरखांने डोळे राजसिंह च्या डोळ्यांना भिडवले.

दोघे एकमेकांना ओळखून होते. क्षणार्धात राजसिंहच्या मनातली शंका पूर्ण निवळली. जर तीरखांने मालीकडचे पैसे लांबवले असते तर इतक्या ठामपणे तो राजसिंहच्या डोळ्यांना कधीही नजर भिडवू शकला नसता.

“तीरखां, माझी चूक झाली.”

“राज, पुन्हा अशी चूक झाली तर ह्या तीरखांची सवय तुला माहीतच आहे,” राजसिंहकडे भेदकपणे बघत तिरखां अशा स्वरात बोलला, की राजसिंह कल्पनेनेच हादरला.

***

![](../../../../assets/reader/challenge/image4.png)

सलीम तीरखां हा त्या जमलेल्या पाच जणांत जबरदस्त होता. अख्ख्या मुंबईत ‘तीरखां’ ह्या नावाचा बेफाम दरारा होता. काळ्या वर्तुळांत त्याच्या सावलीलासुद्धा घाबरणारे अनेक दादा लोक होते, कारण एखाद्याला खलास करणे हे तीरखांसाठी चिलट मारण्यासारखे होते. दहा वर्षांपूर्वी तो भायखळ्यात आला, आणि अगदी पद्धतशीरपणे त्याने आपले वजन बसवले. त्यावेळी सलीम तीरखांची किमान चाळीस माणसांची टोळी होती. खुनापासून बँका लुटण्यापर्यंत, आणि दरोड्यापासून पोलीस स्टेशन जाळण्यापर्यंत त्याने अनेक सुपाऱ्या घेतल्या होत्या. लाखाच्या आत तो काम करत नसे, आणि एकदा काम स्वीकारले की पूर्ण केल्याशिवाय झोप घेत नसे.

एकदा असेच एक जबरदस्त काम त्याच्याकडे आले.

सहा लाखांच्या नोटांची बंडले काम सुरू व्हायच्या आधीच हातात मिळाली होती. काम होते जव्हेरी बाजारातील अमीनचंद जव्हेरीच्या पेढीवर सकाळी कामावर येणाऱ्या सर्व कामगारांना अडवण्याचे. कारण भर दिवसा अकरा वाजता अमीनचंदची पेढी लुटण्याचा एक कट शिजत होता.

तीरखां आदले दिवशीच कामाला लागला. सात सेल्समन, तीन हिऱ्यांना पैलू पाडणारे प्रसिद्ध कारागीर, आणि दुकानाचे रखवालदार वगैरे धरून एकूण पंधरा माणसे त्याच रात्री धावत्या लोकलमधून उडवली गेली. ती घरीही जाऊ शकली नव्हती, तर दुसरे दिवशी कामावर तरी कशी हजर राहणार! दुसऱ्या दिवशी सकाळी बरोब्बर आकराला दरोडा पडला, तेव्हा तीरखां आपल्या माणसांना घेऊन पेढीच्या बाहेर उभा होता. दरोड्याचा माल त्याने ताब्यात घेतला, आणि दरोडा घालणाऱ्या चौघांना त्याने भर रस्त्यात गोळ्या घालून मारले. पंधरात चारांची भर पडली, आणि तीरखां आणि त्याची गँग फरार झाले.

बॉम्बे सी० आय० डी० या अजब दरोड्याने हादरून गेले. सहा महिने तपास सुरू होता. शेवटी केस फाईलला लागली, तेव्हा कुठे तीरखांने ढेकर दिला! असा हा तीरखां होता. अगदी ह्याच्या सावलीलासुद्धा भ्यावे इतका जबरदस्त!

इतक्यात त्याने आपली टोळी बरखास्त केली होती. एक कारण तर आता त्याला ह्या खून-मारामारीचा वीट आला होता. आणि दुसरे, आपले नशीब रोजच आपल्याला साथ देईल ह्याची काय खात्री होती? आता मोजकीच चार माणसे त्याने दिमतीला ठेवली होती. रिट्झ हॉटेलच्या त्या हॉलमध्ये जमलेली ती चार माणसे, हीच त्याची चौकट होती, आणि तीरखां स्वतः बादशहासारखा त्यांच्यावर हुकूमत गाजवू पाहात होता. खरे म्हणजे या चौघांवर त्याची हुकमत जुजबी होती. काय करावे, काय नाही याची प्रत्येकाला मोकळीक होती. कुणाचेही कुणावर बंधन नव्हते. सर्व एकमेकांशी सहकार्याने वागत होते, इतकेच.

मात्र गेल्या पंधरा दिवसापासून त्याच्या संघटनेला जबरदस्त धक्के बसले होते. कुणीतरी हात धुऊन त्यांच्या मागे होते.

***

तीरखांच्या नकळत त्याच्या पापाचा घडा भरत आला होता. काही महिन्यांपूर्वी कशाचीही तमा न बाळगणाऱ्या तीरखांने एक पाखरू जवळ केले होते - माली पानसे. माली कोणी अशी-तशी मुलगी नव्हती. जरी ती त्याला ओळखत नव्हती, तरी तो तिला चांगला ओळखत होता. तिचा आणि क्रूरकर्मा तीरखांचा भूतकाळ एकमेकांत गुंतले होते. मालीला त्याने फार परिश्रमाने पळवले. प्रथम त्याने सरळ तिला भुरळ घातली. तिच्यावर पौरुष गाजवले. त्याच्यासाठी कोणताही त्याग करायला ती तयार झाली होती, तिला फक्त तो हवा होता.

आणि तीरखांला हवी होती संपत्ती - बेसुमार संपत्ती! सोफिया कॉलेजमधे शिकणारी माली पानसे, श्रीमंत बापाची मुलगी माली पानसे - ज्या बापाचा तीरखांने घोर अपराध केला होता, ती माली पानसे - तिला नाहीसे करून तिच्या जागी एक तोतया माली बसवायला त्याला काहीच वेळ लागला नाही.

ह्या नव्या मालीला त्याने आधीच तयार केले होते. ती तिच्या श्रीमंत वर्गमैत्रिणींच्या कुटुंबांची अचूक माहिती काढून आणत होती. बंगल्यांचे, बँकांचे, पेढ्यांचे अगदी अचूक नकाशे त्याच्या हातात पडत होते. लूट करायची, तीही अशा ठिकाणी की काळा पैसाच भरपूर असावा - म्हणजे ज्याची लूट व्हायची त्याला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायला लागावा. अशी अनेक माणसे होती - रोज पाच-दहा साफ केली तरी आयुष्यभर पुरणार होती!

इतकी बेमालूम योजना! पण आज त्या योजनेत कुणीतरी माती मिसळत होतं. कुणीतरी तीरखांचा बाप बनून पुढे आला होता. तो खरंच सामोरासमोर आला असता तर तिरखांने सरळ चुटकीसरशी त्याला उडवला असता, पण जो कुणी अज्ञात त्याच्या मागे होता, तो अंधारातून वार करत होता.

***

सुरुवात झाली बच्चनपासून. प्रथम त्याला फोनवरून धमकी आली. नंतर शंभू भोसलेवर ती पाळी आली \- एक निनावी पत्र, त्यात पन्नास लाखाची मागणी. तिसरा नंबर डॉ. माजगेचा लागला होता. आठवडाभर माजगेला रोज चिठ्ठ्या येत होत्या \- दर वेळेला कुणीतरी नवा मुलगा चिठ्ठी घेऊन येत होता.

शेवटी पाळी आली होती राजसिंहची. एका सकाळी राजसिंहकडे एक अशील आले. त्याला वाटले ते खरोखरच अशील आहे, पण बोलत असताना काहीतरी भिरभिरीत राजसिंहच्या नाकात शिरले. प्लास्टिकच्या पिस्तुलातून त्याच्या तोंडावर क्लोरोफॉर्म फवारण्यात आले होते. काही कळायच्या आतच राजसिंह खाली आपटला, आणि जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याचे हातपाय बांधलेले होते. कशीतरी त्याने स्वतःची सुटका करून घेतली. टेबलावर एक लखोटा होता, आणि आत स्पष्टपणे त्याला धमकी देणारे पत्र होते. पत्राच्या शेवटी सही करतात, त्या ठिकाणी कोरल्यासारखे दोनच शब्द लिहिले होते - ‘लंगडा भालू’!

तीरखांची ती धाडसी चौकट कुणीतरी गदगद हलवली होती, आणि आज त्या अज्ञाताने आपला पहिला बळी घेतलेला होता. माली पानसे!

“राज, कुणीतरी आपल्याला धुळीला मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने दुसरा बळी घ्यायच्या आत त्याला खेचायचं असं मी आता ठरवलंय,” काहीच झाले नाही अशा रुबाबात तीरखां पाइपातला धूर खेचत बोलला, पण तो बोलत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कोणते भाव दिसतात तेही तो पाहत होता.

“तीरखां, तुला कुणाचा संशय येतो?” राजसिंह आता थोडा सावरला होता, शांत झाला होता.

“कुणाचाच नाही. कदाचीत एकच अज्ञात आपल्या सर्वाना धमकी देतोय. कदाचित तो आपल्यातलाच एक आहे.”

शांतपणे तीरखां बोलला, आणि त्याच वेळी किंचित पाय ओढत एक वेटर जवळ येऊन टेबलाजवळ अदबीने उभा झाला.

“साहेब आपला फोन आलाय,” राजसिंहकडे पाहत वेटर म्हणाला.

“कुणाचा, माझा?” राजसिंहला आश्चर्य वाटले.

“आपल्यापैकी सलीमसाहेब कोण?”

“मी…,” तीरखां सावध झाला.

“फोन आपला आहे मग.”

“आलो, चल.” तीरखां ताडकन उठला.

अशा वेळी कुणाचा फोन असावा याचा विचार करत तो कोपऱ्यातल्या मॅनेजरच्या काउंटरजवळ पोचला. हॉटेल रिट्झ हे जुहू बीचवरील अलिशान हॉटेल होते. तेथे येणाऱ्या श्रीमंत लोकांना शांतपणे फोनवर बोलता यावे म्हणून बूथसारखी पार्टिशनची सोय केली होती. तीरखां सरळ बूथमध्ये शिरला आणि मॅनेजरच्या मागे बसलेल्या ऑपरेटरने दोन स्लॉट्समध्ये पिना सारून त्याला लाईन दिली.

“हॅलो, मी तीरखां.”

“तीरखां, मी लंगडा भालू.” पलीकडून गंभीर धारदार आवाज आला.

“कोण?” आश्चर्याने आणि रागाने तीरखांने विचारले.

“मीच, तीरखां. ऐक. उद्या सकाळी मला तुझ्या सर्व मिळकतीतला निम्मा हिस्सा हवाय.”

“नाही दिला तर तू काय करणार आहेस?” तीरखां ओरडला. त्याचा स्वतःवरचा ताबा गेला होता.

“ते अगदी शेवटी समजेलच. पण त्याआधी तुला एक संधी देतोय.”

“काही गरज नाही. आता माझेच ऐक, भालू. उद्या मीच माझी हालचाल सुरू करणार आहे.”

“उत्तम.”

“भाल्या… तू कितीही अंधारात दडलास तरी मी तुला शोधून काढीन,” रागाने थरथरत तीरखां किंचाळला.

“छान!”

“भाल्या… मी तुला हालहाल करून मारीन.”

“माझी तयारी आहे.”

“मग समोर येऊन लढ.”

“तोही दिवस दूर नाही.”

“तू भेकड आहेस.”

“नाही तीरखां, मी शेर आहे! म्हणूनच तुला सांगतोय. तुझी चौकट निखळणार आहे.” आणि पलीकडून फोन कट झाला.

कितीतरी वेळ तीरखां लालेलाल होऊन थरथरत नुसता उभा होता. चौघांच्या समोर येऊन तो कधी बसला हे त्याचे त्यालाच समजले नव्हते. एखाद्या वेड्यासारखी त्याची अवस्था झाली होती.

“सलीम, कुणाचा फोन होता?” शंभू भोसलेने विचारले तेव्हा कुठे तो भानावर आला.

“लंगड्या भालूचा.” आवाजातली थरथर तो लपवू शकला, पण पाईप शिलगावताना त्याचे हात मात्र चांगलेच कापत होते. चौघे घाबरून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते. तीरखां शांत होऊन धूर खेचत होता, पण त्याच्या डोक्यात भयानक विचारांची उलथापालथ सुरू होती.

![](../../../../assets/reader/challenge/image5.png)