Skip to content

११: सूडाचा शेवट

(काही तासांपूर्वी काय घडले:)

संध्याकाळ झाली आणि रिट्झ हॉटेलच्या पहिल्या शिफ्टचे वेटर्स आपापल्या क्वार्टरकडे निघाले. शिफ्ट संपल्यावर नेहमीच अशी गडबड उडत असे. त्याच वेळी सात नंबरच्या वेटर्स क्वार्टरमधून एक माणूस बाहेर पडला. त्याला पाहिले तर कुणीही वेटर म्हणणार नाही इतका त्याचा पोशाख अप-टु-डेट होता. त्याने शेवाळी रंगाचा ट्वीड घातला होता. डोक्यावर त्याच रंगाची हॅट होती. दोन पायऱ्या उतरून तो गेटकडे चालत निघाला. चालताना तो डावा पाय जमिनीवर ओढत चालत होता आणि दुसरा उजवा पाय गुढघ्यात वाकवून जोरात जमिनीवर आपटत होता.

आता तो रिट्झ हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडला. दोन फर्लांग चालत तो जुहू कँडीच्या रोखाने निघाला, तेव्हा एक टॅक्सी भर वेगात त्याच्या समोरून पुढे गेली आणि पाच फुटांवर थांबली. तो मागचे दार उघडून आत बसला आणि टॅक्सी परत भर वेगात निघाली. आज टॅक्सी चालवणारा दुसराच होता.

“संतू, काय झालं?” आत बसता बसताच त्याने प्रश्न केला.

“साहेब, बरीच खळबळ उडालीय. शंभू खलास झाला हे दुपारी तीरखांला समजले.”

“छान, नंतर?”

“त्याने भराभर दोघांना फोन केले.”

“आणि तिसरा?”

“साहेब, तो बेपत्ता आहे.”

“कोण?” आश्चर्याने तो साहेब म्हणवून घेणारा ओरडला.

“डॉक्टर माजगे.”

“संतू, तो होय! तो तर मेला!” जोरात हसला साहेब.

“कधी?”

“काल रात्री. सुदर्शनच्या तळघरात त्याचे प्रेत सडत पडले असेल. सुरा त्याच्या मेंदूत शिरलाय.”

“सुदर्शन?” घाबरून संतू ओरडला.

“हो. सुदर्शन मोहिते. तो काल राजसिंगकडे आला होता. संतू, पोरं हुषार आहेत. म्हणून हे काम मी त्यांच्यावर सोपवलं होतं. पण शेवटपर्यंत त्यांना हेच कोडे पडायला हवे की भालू कोण?” साहेब खदखदून हसला.

त्याचे हसणे अतिशय भेसूर होते. सुडाचे विष ह्या हास्यातून थबथबून ओघळते आहे असेच संतूला वाटले. हसता हसताच साहेबाने कोटाच्या खिशातून दोन सुरे बाहेर काढले. ते शेजारी सीटवर टाकून त्याने पायातला बूट काढून हातात घेतला. आणि उलटा करून तळाची बाजू वर घेतली. तो तळ चांगला अर्धा इंच जाड होता. टाचेच्या बाजूला दोन्ही बोटांनी दाबून साहेबाने तळ बाहेर ओढला, तेव्हा कापल्यासारखा त्याचा अर्धा भाग बाजूला झाला. आत विलक्षण रचना होती. टाचेच्या बाजूला लागून दोन स्प्रिंगा होत्या आाणि स्प्रिंगांच्या पुढे पाव इंच जाडीचा लोखंडी तुकडा होता. त्या लोखंडी तुकड्याला हुकासारखा एक नॉब होता.

दोन्ही सुरे साहेबाने त्या लोखंडी तुकड्याच्या समोर दाबून बसवले. स्प्रिंग मागे सरकली, दाबाने आकसली, आणि नॉबचा हुक ‘कट’ आवाज करत स्प्रिंग खेचून थांबला. काही बिघाड नाही याची साहेबाला खात्री करून घ्यायची होती. त्याने बुटाच्या टाचेवर हाताची मूठ आपटली. ‘सप् सप्’ असा आवाज झाला आणि दोन्ही सुरे झटक्यात उसळत बाहेर पडले, आणि टॅक्सीच्या दाराला असलेल्या मऊ कॉनव्हासच्या आवरणात घुसून थरथरत राहिले. टाच आपटल्यावर सुरे असेच अचूक बाहेर पडणार होते. दुसरा बूट काढून त्याने तसलेच दोन सुरे दुसऱ्या बुटाच्या तळाला बसवले. सुरे दाबून झटक्यात तळ फिरवला तेव्हा परत तो ‘कट’ आवाज झाला.

त्याने दोन्ही बूट पायांत घातले आणि हात चोळले. आज तो निदान दोघांना तरी उडवणार होता. त्याने मनाशी तसा निश्चय केला होता. टॅक्सी आता माटुंगा मागे टाकून दादरच्या रोखाने धावू लागली.

“संतू, इथेच थांबव.”

टॅक्सी थांबली तेव्हा तो घाईघाईत बाहेर पडला आणि समोरच असलेल्या टेलिफोन बूथच्या रोखाने निघाला. संतूला त्याच्या चेहऱ्याचा रंग क्षणाक्षणाला बदलताना दिसत होता. सुडाचा जबरदस्त असा भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता. त्याने एक नंबर फिरवला. पलीकडे रीसिव्हर उचलल्याचा आवाज होईपर्यंत तो स्तब्ध होता.

***

“हॅलो, अ‍ॅड० राजसिंह हिअर.” साहेब हसला. अगदी त्याला हवी ती संधी आज मिळाली होती. प्रथम राजसिंहबरोबर बोलायला मिळावे अशी त्याची मनापासून इच्छा होती.

“राजसिंह, मी भालू बोलतोय. लंगडा भालू. राजसिंह, मला तू दडवलेली रक्कम हवी आहे.”

“कसली रक्कम?”

“साव बनायचा प्रयत्न केलास तरी मला तू फसवू शकणार नाहीस. राजसिंह, मी आज रात्री तुला गाठणार आहे.”

“तूच मरशील… तुला मरावेच लागेल भालू!” घाबरलेला राजसिंह अचानक ओरडला. त्याचा स्वतःवरचा ताबा उडाला होता.

“राजसिंग, पुन्हा विचारतो.”

“गरज नाही,” एवढेच बोलून राजसिंगने खटकन रीसिव्हर आपटला.

तो साहेब म्हणवणारा पुन्हा डायल फिरवू लागला. नाणी टाकून त्याने रीसिव्हर डाव्या हातात घेतला.

“हॅलो, तीरखां?”

“हो, तीरखां बोलतोय. कोण?”

“तीरखां, शंभू मेला.”

“काय?”

“माजगेसुद्धा रात्री खलास झाला. त्याच्या मेंदूत वरून सुरा घुसलाय.”

“तू कोण बोलतोयस?” तीरखांचा आवाज थरथरत होता.

“मी भालू. तीरखां, मला लुटीची रक्कम हवीय. नाहीतर तुला मरावे लागेल.”

“भालू, एक दिवस तुला मी गाठणार आहे.”

“त्याआधीच तू मरशील.”

ताडकन त्या साहेबाने फोन क्रेडलवर ठेवला आणि दार उघडून तो बूथमधून बाहेर पडला. रस्ता पार करून टॅक्सीपर्यंत येताना तो रागाने पिसाळून उठला होता. मागच्या सीटवर तो बसला आणि त्याच रागाच्या भरात ओरडला, “संतू, हॉटेलकडे घे.”

टॅक्सी मागे वळली. अचानक साहेबांचा बेत बदललेला पाहून संतूला आश्चर्याचा धक्का बसला. पाऊण तासाने संतूने टॅक्सी हॉटेल रिट्झच्या पार्किंग लॉटमध्ये सारून पार्क केली, तोपर्यंत मागे बसलेला साहेब शांत झाला होता.

“संतू, आत जाऊन टेबल बुक करून ये. कुणाला संशय यायला नको. निदान पंधरा मिनिटं तरी मॅनेजरबरोबर गप्पा मार,” साहेब म्हणाला, आणि क्षणाचा उशीर न लावता संतू बाहेर पडला.

साहेब समोर काचेच्या आत असलेल्या दोन आरशांकडे पाहत मागच्या सीटवर शांतपणे बसला होता. संतूने टॅक्सी अशा जागी उभी केली होती की हॉटेलच्या समोर असलेल्या पटांगणातील प्रत्येक हालचाल आत बसून आरशात दिसत होती.

सव्वासात झाले आणि साहेब सावध झाला. आत येणारी गाडी पाहून तो हबकलाच. सुदर्शनची सन-बीम आत येत होती. गाडी पाहताच त्याने ती ओळखली. पाठोपाठ दुसर्‍या दोन गाड्या आल्या. एक फियाट होती आणि एक स्टँडर्ड हेरॉल्ड.

सुदर्शन ह्या वेळी इथे कसा?

तिघे आत शिरतात न शिरतात तोच त्याला पुन्हा जबरदस्त धक्का बसला. बॉम्बे सी० आय० डी०ची जीप गेटमधून आत शिरत होती. जीप थांबली आणि इन्स्पे० ज्योतिप्रसाद खाली उतरला.

सुन्न झाल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. क्षणभर त्याला वाटले, आपली सर्व योजना ढासळणार! तरीही तो हार मानायला तयार नव्हता. चौघे असले तरी आपल्याला ते अडवू शकणार नाहीत अशी घमेंड त्याला स्वत:बद्दल होती.

साडेसातला इतर तीन गाड्या रिट्झच्या गेटमधून आत शिरल्या, आणि त्यांतून तिघे बाहेर पडताना त्याने पाहिले. राजसिंह फुल सूटमध्ये होता. मागे दोघे होते - तीरखां आणि बच्चन.

आत शिरताच तिघांना उडवायचे असा त्याचा विचार होता, पण तो आता बदलावा लागणार होता. कसलीही घाई नसल्यासारखा तो बसून राहिला. संतू आत येऊन ड्रायव्हिंग व्हीलजवळ बसला. तेव्हाही तो हल्ला कसा उडवून द्यायचा याचा विचार करत होता.

“साहेब, तिघे जाम हादरलेत.”

“हम्…”

“साहेब, तुम्ही काय ठरवलंय?”

“संतू, प्रश्न विचारू नकोस. फक्त गाडी कोणत्याही क्षणी फाटकातून बाहेर काढण्याची तयारी ठेव,” तो जरबेने बोलला आणि संतू गप्प झाला.

नऊला दहा मिनिटे कमी असताना अ‍ॅड० राजसंग घाईघाईत बाहेर पडताना त्याने पाहिला. भरारत राजसिंगने कार गेटमधून बाहेर काढली, आणि तो हसला. राजसिंह लवकर का बाहेर पडला हे आता त्याच्या लक्षात आले. आजची रात्र तो विरारच्या बंगल्यात काढणार ह्याची साहेबाला कल्पना आली. राजसिंगचा पूर्ण इतिहास त्याला माहीत होता. राजसिंह पाताळात जरी दडला तरी तो त्याला केव्हाही खेचून काढू शकला असता.

अर्ध्या तासाने इतर दोघे बाहेर पडले. त्याने तीरखां आणि बच्चन यांना पोर्चमधून पार्किंग लॉटकडे सरकताना पाहिले आणि दार खेचून बाहेर पडताना तो हळू आवाजात म्हणाला, “संतू, गाडी तयारीत ठेव.”

आता तो चालत दोघांच्या रोखाने निघाला. त्याच्या डोळ्यात सुडाचा खून उसळत होता. चालताना त्याला आपल्या अधू पायाचाही पूर्ण विसर पडला. अंगात चैतन्य संचारल्यासारखे वाटत होते. दोघांपासून पाच पावलांवर तो थांबला. दोन्ही हात खिशात खुपसून तो फाशीची शिक्षा ठोठावणाऱ्या जेलरच्या रूबाबात उभा राहिला.

“तीरखां!” तो बोलला तेव्हा त्याचा आवाजही चढला नव्हता. सार्वजनिक ठिकाणी तो उभा होता. पाहता पाहता लोक जमा झाले असते.

“कोण?” गपकन कारच्या रोखाने निघालेला तीरखां उभा राहिला.

“मी. भालू… किंवा शंकरदेव पानसे. तू ठरव!”

“तू? इथे?”

“हो तीरखां! पण तुझ्या पापांचा पाढा मी राजसिंहपुढे वाचीन. तुझ्याशी मला काहीही बोलायचं नाही. फक्त तुम्हा दोघांना मारायचं आहे.”

दोघांनी घाबरून आजूबाजूला पाहिले. भालू एकटाच आपल्याला धमकी द्यायला येईल असे त्यांना अजिबात वाटले नव्हते, पण पानसे जिवंत असण्याचा धक्का कितीतरी मोठा होता. तीरखांचा हात झटक्यात कंबरेकडे सरकला, मात्र त्याला रिव्हॉल्वर काढायची संधीच मिळाली नाही. काय होते आहे हेच त्याला समजले नाही.

भालू उजवा पाय झाडून, अधू पायावर गिरकी घेऊन उसळला आणि त्याच्या हाताचा फटका तीरखांच्या मानेवर जोरात बसला. तीरखां सावरायच्या प्रयत्नात असतानाच हेलपाटत फेकला गेला. त्याच वेळी साहेब जमिनीवर पाय आपटून उसळला आणि त्याच्या पायाचा फटका जोरात तीरखाच्या पाठीत बसला. साहेबाने पायाला एक खास झटका दिला.

सप सप आवाज करत दोन सुरे तीरखाच्या पाठीत घुसले.

तीरखाने भीषण किंकाळी ठोकली आणि तो प्रकार पाहणारा बच्चन धावत सुटला. मात्र दोन पावलेसुद्धा त्याला धावता आले नाही. त्याच्याही पाठीत दोन जोराचे फटके बसले आणि बच्चन तोंडावर आपटला. खाली आपटताच त्याने जीव तोडून किंकाळी ठोकली.

पाठीत धारदार काहीतरी शिरले होते. त्याची कळ त्याच्या मेंदूपर्यंत पोचली आणि बच्चन पुन्हा किंचाळला.

साहेबाने दोन पायांवर उडी घेत स्वतःला सावरले. तेव्हा टॅक्सी वेगात येऊन त्याच्याजवळ थांबली. मागचे दार खेचून तो आत बसला आणि त्याने मागच्या सीटवर मान टेकली. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. छाती भात्यासारखी वरखाली होत होती.

“संतू, बांद्रा स्टेशनवर घे,” त्याही स्थितीत तो धापा टाकत ओरडला, तेव्हा टॅक्सी रिट्झ हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडली होती. कितीतरी वेळ त्याचा श्वास टॅक्सीच्या वेगाशी स्पर्धा करत होता.

विरारची दोन तिकिटे काढून तो स्टेशनवरच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवर आला. लोकल धडधडत आली आणि घाईघाईने तो फर्स्ट क्लासच्या डब्यात शिरला. मागे संतू होताच. विरार हे वेस्टर्न रेल्वेचे शेवटचे स्टेशन होते आणि तिथे पोचायला निदान एक तास तरी लागणार होता. शांतपणे तो एक बाकावर बसला आणि त्याने डोळे मिटून घेतले.

आता तो राजसिंहला कसे मारायचे याचा विचार करत होता. विरारच्या बंगल्याचा पूर्ण नकाशा त्याच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर उभा होता. एक तास त्याने ह्याच विचारात घालवला. संतूने काही बोलायचे धाडस केले नाही.

लोकल विरार स्टेशनवर उभी राहिली तेव्हा तो स्टेशनच्या विरुद्ध बाजूच्या प्लॅटफॉर्मवर उतरला आणि चालत लॅव्हेटरीकडे सरकला. पाच मिनिटांत तो लॅव्हेटरीमधून बाहेर आला, तेव्हा शेवटचे दोन सुरे त्याने बुटाच्या तळव्यात बसवले होते.

तो अ‍ॅड० राजसिंहच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर उभा राहिला तेव्हा रात्रीच्या साडेअकराचा टोला पडत होता.

आत शिरणे त्याच्या दृष्टीने फार सोपे होते. दाराला अंगचेच कुलूप होते आणि त्याच्यासारख्या सराईत दरोडेखोरासाठी ते कुलूप उघडणे म्हणजे हातचा मळ होता. त्याने एक तार थोडी वाकवून की-होलमध्ये सारली, दोन वेळा फिरवली, आणि खटक्याची मूठ सावकाश फिरवून तो आत शिरला. आता तो दिवाणखान्यात उभा होता आणि तरी त्याच्या आगमनाची साधी चाहूलसुद्धा राजसिंहला लागली नव्हती.

राजसिंह त्याच्याकडे पाठ करून तिरका बसला होता. समोर टीपॉयवर व्हॅट सिक्स नाईन होती, आणि स्वतःच्याच विचारांत गढून तो ती सोड्याशिवायच पीत होता. हातातील सिगारेट सारखी ओठांजवळ नेऊन धुराची वलये हवेत फेकत होता.

“राजसिंह, मी आलोय,” करड्या आवाजात साहेब म्हणाला, आणि तो आवाज कानावर पडल्याबरोबर राजसिंह धडपडून उठला. साहेबाने बंगल्याची तंतोतंत माहिती असल्यासारखी भिंतीवरच्या अनेक बटणांतील तीन बटणे दाबली आणि सर्व दिवाणखाना प्रकाशाने न्हाऊन निघाला.

थक्क झालेला राजसिंह डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होता.

पाय ओढत काळासारखा साहेब त्याच्या रोखाने निघाला.

***

“पानसे!” राजसिंह दचकून ओरडला.

“हो राजसिंह, मी पानसेच,” त्याच्या आवाजात खून होता. राग होता. सूड तर काठोकाठ भरला होता.

“तुम्हांला वाटलं, पानसे मेला? नाही, मी जिवंत आहे. तुम्ही सर्वांनी माझा विश्वासघात केलात. त्याचा बदला घ्यायला मी जिवंत आहे अजून.”

मशीनगनमधून गोळ्या सुटाव्यात तसा तो बोलत होता. भूतकाळातील दडलेले पडदे एकेक करून, उचकटत, भीषण सत्य राजसिंहसमोर उघडे करून दाखवत होता. राजसिंह थरथरत होता. पानसेच्या तोंडून निघणारे शब्द ऐकत होता.

“राजसिंह, दहा वर्षांपूर्वी विमान अपघातात मला ठार करण्याचा तुम्ही सर्वांनी निकराचा प्रयत्न केलात. नशिबाने मी वाचलो. तरीही मला एक पाय कायमचा गमवावा लागला.

“माझ्या हिश्शाचे चाळीस लाख तीस हजार तुम्ही पाच जणांनी वाटून घेतलेत. आणि माझ्या मुलीला ठार करून तिच्या जागेवर नकली मालिनी पानसे तयार करून बसवलीत. पैशासाठी तुम्ही मला आणि माझ्या मुलीला ठार केलेत. देवाने मला तुमचा सूड घेण्यासाठी जिवंत ठेवले. हा माझा इतिहास आहे.

“आता चार खलास झाले, तसाच पाचवा तूही मरणार आहेस.”

घाबरून राजसिंहचा हात खिशाकडे सरकला.

“राजसिंग, पुन्हा तुझा हात खिशाकडे सरकला तर पिस्तूल बाहेर काढायच्या आत तू मरशील.”

“नको, मला मारू नकोस.” राजसिंह घाबरून ओरडला.

“का? माझ्या मुलीला ठार करताना तुझा हात कसा उचलला?”

“पानसे, मी नाही … मला…” राजसिंह कमालीचा घाबरला होता. त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा बाहेर पडेना.

“राजसिंह, तुला कुणीही वाचवू शकणार नाही.”

आणि तो उसळला…

पण त्याच्यामागे दार हळूहळू उघडले जात आहे याची त्याला कल्पना नव्हती. राजसिंहच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजात हलकेच दार उघडून त्रिकूट आत शिरलेले त्याला समजले नव्हते.

सुदर्शनने चपळाईने हालचाली केल्या, पण तरीही पहिला सुरा राजसिंहच्या पाठीत शिरलाच. पानसे पुन्हा उसळी घेत असताना मात्र सुदर्शनने सरळ त्याच्या पायावर गोळी झाडली. जोरात ओरडून पानसे खाली आपटला. आपटताना तो तोंडावर, गुढग्यात पाय वाकवून पडला होता, आणि त्याच्याच बुटातून सणसणत बाहेर पडलेला सुरा त्याच्या नरड्यातून आरपार गेला.

***

“ज्योती, शेवटी त्याच्याच सुऱ्याने तो मेला,” पुढ्यात पडलेल्या शंकरदेव पानसेच्या देहाकडे बघत सुदर्शन म्हणाला.

सुरा कसा फेकला गेला होता हे अजूनही ज्योतिप्रसादला समजत नव्हते. त्याने पानसेच्या पायातला बूट खेचून काढला. तो तपासताना त्याने चुकून टाचेजवळ दाब दिला तेव्हा बुटाचा अर्धा तळ बाजूला झाला.

“सुरा इथे बसवला होता तर!” सुदर्शन अवाक होऊन उद्गारला. इतक्या मृत्यूंना कारणीभूत असलेल्या त्या अजब बुटाकडे आणि सूडाच्या आगीत होरपळून मेलेल्या त्या अजब गुन्हेगाराकडे सर्व जण आश्चर्याने पाहत होते.

त्या चमत्कारिक खुनांचे आणि विलक्षण सुऱ्यांचे रहस्य शेवटी हे असे उलगडले होते.

![](../../../../assets/reader/challenge/image6.png)