Skip to content

१०: अंतिम आव्हान

ते परत त्याच टेबलावर बसले होते, पण आता ते तिघेच होते. साडेसात वाजताच तिघांनी एकमेकांना फोन करून ती भयानक बातमी सांगितली होती - शंभू भोसले खलास झाला होता. आणि डॉ० माजगेही नाहीसा झाला होता. इतका धक्का तिघांना कधीही बसला नव्हता. तीरखांच्या माणसांनी बातमी आणली होती - शंभू भोसले संपला होता. दोन सुरे त्याच्या शरीरात घुसले होते - एक कुशीत आणि दुसरा पाठीतून हृदयात.

तीरखां उजव्या बाजूच्या खुर्चीवर बसला होता आणि तो दोघांकडे आपली धारदार नजर रोखून पाहत होता. अ‍ॅड० राजसिंह थरथरत होता. तीच अवस्था बच्चनची होती - तोही घाबरला होता, पण ते न दाखवायचा त्याचा प्रयत्न चालू होता. आता अ‍ॅड० राजसिंह काहीतरी बोलण्यासाठी पुढे झाला आणि तीरखांच्या डोळ्यांतील राग पाहून गप्प झाला. बच्चन चुळबुळत होता. शेवटी गप्प बसलो तर आपल्याला वेड लागेल असे त्याला वाटू लागले. ही कोंडी फोडायला हवी होती.

“तीरखां, शंभू अगदी तसाच खलास झाला,” बच्चन घाबरत म्हणाला.

“हो. मालीसारखाच त्याला उडवलाय.” काही झालेच नसावे अशा आवाजात तीरखां म्हणाला. त्याचा चेहरा कमालीचा शांत होता. असा शांत बनलेला तीरखां कधी कधी किती भयानक बनतो याची समोर बसलेल्या दोघांना कल्पना होती..

“शंभूच्या जवळच्या रकमेचं काय?” राजसिंह थरथरत म्हणाला. सुदर्शन मोहिते काल रात्री त्याला भेटला होता हेही त्याने दोघांच्या कानावर अजूनपर्यंत घातले नव्हते.

“त्याची चौकशी करून काय उपयोग?”

“तीरखां, एक गोष्ट स्पष्ट आहे. आपल्या मागे जो लागला आहे त्याला ती रक्कम हवीय. दोन्ही खून पैशासाठीच झालेत.”

“कशावरून?”

“मालीला फोन आला होता, तेव्हा त्याने पैशाची मागणी केली होती. आणि आपणा सर्वांना त्याने फोन केले होते. तेही पैशासाठीच.” राजसिंह घाबरला होता, तरीही त्याचे वकिली डोके मुद्दे मांडत होते.

“राजसिंह, कबूल. पण शंभूचा पैसा त्याला कशावरून मिळाला असेल?”

“शंभूने मरणाच्या भीतीने सर्व रक्कम देऊन टाकली असेल.”

“माझी रक्कम सुरक्षित आहे,” बच्चन म्हणाला.

“आपणा सर्वांना आता नीट विचार करावा लागेल,” राजसिंह एकाएकी गंभीर झाला होता.

“हो,” बच्चन काहीच बोलू शकला नाही.

“तीरखां, तू फक्त त्या लंगड्याचा विचार करू नकोस,” राजसिंह धीर करून म्हणाला. “त्याच्याशिवाय दुसरेही आपल्या मागे आहेत याचा मी सध्या विचार करतोय.”

“दुसरे कोण?”

“त्रिकूट!”

“हे नवे कोण?” तीरखां आश्चर्याने राजसिंगकडे पाहत बोलला.

“तुला माहीत नाही?” अ‍ॅड० राजसिंह थक्क होऊन बोलला. तीरखां त्याच्यापेक्षा ह्या क्षेत्रात मुरलेला होता, आणि तरी…

“नाही…”

“सुदर्शन मोहिते माहीत नाही?” अ‍ॅड० राजसिंहने विचारले, आणि तरीही सलीम तीरखां त्याच्याकडे पाहतच राहिला.

खरंतर तीरखां सुदर्शन मोहितेला चांगलाच ओळखत होता. त्याच्या भागीदारांबद्दलसुद्धा त्याला बरीच माहिती होती. तिघेही अतिशय भयंकर आहेत हे त्याला माहीत होते. जर खरोखरच हे त्रिकूट आपल्या मागे लागले असेल, तर त्यांचा धोका ही मोठीच अडचण होती. पोलिसांना तीरखांने कधी भीक घातली नव्हती, पण त्रिकूटाबद्दल मात्र तो आजपर्यंत नेहमीच सावध राहत आला होता. त्यांच्या नजरेस कधीही पडायचे नाही हे तत्व त्याने आजपर्यंत तंतोतंत पाळले होते.

“राजसिंह, तुला असं का वाटतं?”

“तो माझ्याकडे आला होता काल.”

“कधी? कोण?” घाबरून तीरखांने विचारले.

“सुदर्शन मोहिते. रात्री आला होता. माली पानसेबद्दल चौकशी करत होता. मी त्याला उडवून लावला.”

“राजसिंह, हे आधी का सांगितले नाहीस?” तीरखां एकाएकी तापला.

“त्याची जरुरी वाटली नाही मला.”

“राजसिंह, तू मूर्ख आहेस,” तीरखां रागाने ओरडला.

“हे बघ तीरखां, एकमेकांत भांडत बसायची ही वेळ नाही,” बच्चनने मध्येच सावरायचा प्रयत्न केला, आणि चिडलेला तिरखा शांत झाला.

घाबरून अ‍ॅड० राजसिंह तीरखांकडे पाहत राहिला, कारण त्याच्या आता शांत झालेल्या डोळ्यांत चकाकणारा जहरी खून त्याला स्पष्ट दिसला होता. हा तीरखां आपल्याला लौकरच उडवणार असे त्त्याला वाटले.

“तीरखां, ऐक. त्रिकूट तितकं महत्त्वाचं नाही,” राजसिंह सावरायचा प्रयत्न करत होता.

“मलाही तसंच वाटते,” बच्चनने दुसऱ्या वेळेला तोंड उघडून राजसिंहला साथ दिली होती.

“आपल्याला खरा धोका आहे लंगड्या भालूचा. मला असंच स्पष्ट दिसतंय. तोच आपल्या सर्व रकमेच्या मागे आहे आणि त्याला आपल्याबद्दल पूर्ण माहिती आहे. त्या अर्थी तो बरेच दिवस आपल्या मागे असावा. त्याने मालीपाठोपाठ शंभूला उडवलं, आणि माजगेसुद्धा आज आपल्यात नाही. तीरखां, शंभू मेला. तो बोलला नसेलही. पण माजगे पोपटासारखा बोलेल.”

“माजगे गेला कुठे?”

“तेच तर समजत नाही.”

“तीरखां, तू तुझ्या माणसांना बातम्या मिळवायला सोड. माजगे सापडायला हवा. तो बोलला तर आपल्याला जास्त धोका आहे. आणि माजगे गेलाय तरी कुठे?” अ‍ॅड० राजसिंह कडक शब्दात म्हणाला.

“त्याला भालूने गाठला असेल?”

“अशक्य. माजगे फार सावध असतो.”

“शंभू नसतो, असं तुला म्हणायचं आहे काय? तीरखां, शंभू भोसले असले हजार भालू पचवेल असंच मी समजत होतो. आणि तोही मेला, याला तुझ्याजवळ उत्तर आहे का?”

“राज, आता तू काय ठरवलं आहेस?”

“तीरखां, आज आपण तिघे आहोत. भालू आज ना उद्या आपल्याला गाठणार आहे. तो पैशासाठी खून पाडतोय. तेव्हा मी म्हणतो, आपण तिघांनीही आपापल्या रकमेतला निम्मा हिस्सा ह्या भालूला द्यावा.”

“राजसिंह, काय बोलतोयस तू?” तीरखां ओरडला.

“हे बघ तीरखां, तुझी मरायची तयारी असली तरी माझी नाही. पुन्हा भालूचा फोन आला तर चक्क माझ्याजवळची सर्व रक्कम मी त्याच्या हातावर आपटून मोकळा होणार आहे.” ठाम आवाजात राजसिंह बोलत होता.

“राज, तू घाबरलायस?” तीरखांने विचारले.

“हवं तर तसं समज. तीरखां, सुरे कुठून येतात हेही समजत नाही, तर तू प्रतिकार तरी कसा करणार आहेस हे सांगशील?” रागाने राजसंह ओरडला.

“मरणाला मी भीत नाही.”

“मीही नाही. पण म्हणून कुत्र्यासारखं मरायची माझी तयारी नाही.”

राजसिंह त्याच ठाम आवाजात बोलत होता. आता तीरखांच्या नजरेची भीती त्याला वाटत नव्हती. निर्णय एकदा घेतला की बदलायचा नाही असाच त्याचा स्वभाव होता. मनातून त्याने भालूचा फोन आल्यावर काय बोलायचे हेही ठरवून टाकले होते.

“राज, तुझा निर्णय पक्का झाला?” तीरखांची नजर सरळसरळ राजसिंगवर रोखलेली होती आणि त्या नजरेत राजसिंहला आपला मृत्यू दिसत होता.

“हो.”

“राज, तू त्याला काय सांगणार आहेस?”

“तुमच्याबद्दल?”

“हो.”

“काहीच नाही. तीरखां मी माजगेच्या रक्ताचा नाही. स्वार्थासाठी माझ्यामागे मी तुम्हांला मृत्यूच्या दाढेत ओढणार नाही,” राजसिंह जोरात म्हणाला आणि झटका आल्यासारखा उठून ताडताड चालत निघाला.

दोन मिनिटांत तो हॉटेल रिट्झच्या पोर्चमधून बाहेर पडत होता. हॉटेलचे वातावरण नेहमीच शांत असते. त्या शांत वातावरणात अ‍ॅड० राजसिंहच्या भरारत गेलेल्या कारचा आवाज स्पष्ट कानावर येत होता. तीरखां राजसिंह गेलेल्या दिशेने पाहत होता तर बच्चन घाबरून त्याच्याकडे. तीरखाच्या नजरेतच त्याला अनेक गोष्टीचा स्पष्ट खुलासा मिळाला होता.

“बच्चन, हा राजसिंह कधीतरी आपल्याला खड्ड्यात गाडून माती सारणार! तू त्याला ओळखत नाहीस. उद्या त्याच्यावर शेकलं तर सरळ तो आपल्याकडे बोट दाखवून मोकळा होईल.”

“तीरखां, तू काय ठरवलं आहेस?” घाबरून बच्चन म्हणाला.

“अजून काहीच नाही. मात्र आज रात्रीला काहीतरी ठरवायलाच हवं.”

“तो धूर्त आहे. त्याला आपल्या हालचालींचा पत्ता लागला तर तो भयंकर बनेल.”

“बच्चन!” तीरखां ओरडला आणि बच्चन कमालीचा घाबरला. आपलीही उद्या राजसिंहसारखीच अवस्था होणार याची त्याला स्पष्ट कल्पना आली.

“तीरखां, मला वाटतं, तू गडबडीने निर्णय घेऊ नयेस.”

“नाहीच! मी एक चाल राजसिंहला खेळण्यासाठी देणार आहे. बच्चन, मी नेहमीच पहिली चाल दुसऱ्याची मानतो. पण शेवटची चाल माझी असते.” तीरखां अशा आवाजात ते वाक्य बोलला की आता ब्रम्हदेवसुद्धा राजसिंहला वाचवू शकणार नाही याची बच्चनला पूर्ण कल्पना आली.

![](../../../../assets/reader/challenge/image8.png) ![](../../../../assets/reader/challenge/image7.png)![](../../../../assets/reader/challenge/image9.png)

***

दोघे डायनिंग हॉलच्या उजव्या कोपऱ्यात बसले होते, तर त्यांच्या अगदी विरुद्ध बाजूला तीस फुटांवर त्रिकूट बसले होते आणि टेबलभोवतीच्या चौथ्या खुर्चीवर इन्स्पे० ज्योतिप्रसाद बसला होता. डायनिंग हॉलमध्ये मंद प्रकाश होता, पण बाकी सर्व अंधाराचेच साम्राज्य होते. चौघांच्या डोक्यावर फेल्ट हॅट्स होत्या आणि त्या खाली कपाळावर ओढल्यामळे त्यांचे निम्मे चेहरे झाकलेले होते. सर्वांच्या माना खाली होत्या. कुणीच त्यांना ओळखण्याची शक्यता नव्हती. त्यांच्यासमोर टेबलावर तोच ट्रॅन्झिस्टर होता. तिघांच्या बोलण्यातील प्रत्येक शब्द न् शब्द त्यांच्या कानावर आला होता. सुदर्शनने जेव्हा किंचित मान वर करून पाहिले, तेव्हा त्याची नजर अंधाराचा भेद घेत तीरखांच्या नजरेतील धोका ओळखून गेली होती.

“ज्योती, आजचीच रात्र कतलीची आहे,”

“हो. मलाही तसंच वाटतं.”

“आज फक्त राजसिंह वाचणार आहे.”

“काय? कशावरून करतोयस हे विधान?” आश्चर्याने ज्योतिप्रसाद सुदर्शनकडे पाहत राहिला.

“तो वकील आहे. आणि तू त्याच्या गाडीचा आवाज ऐकलास!”

तिघेही चाट पडले होते. आता हा सुदर्शन कोणता धक्का देणार आहे तेच त्यांना समजत नव्हते.

“तो इथून तर गेला, पण तीरखांला आज रात्री तो घरी सापडणार नाही.”

“मग कुठे गेला तो?”

“तो अगदी विरुद्ध दिशेने गेला. तो गेला विरारला. राजसिंहने कधीतरी सुट्टीत विश्रांतीसाठी वापरता यावा म्हणून स्टेशनजवळ घेतलेला बंगला आहे विरारला!”

“सुदर्शन, तू बरीच माहिती मिळवलीस.”

“सहज बोलता बोलता पार्टीच्या वेळी तो बोलला होता.”

तितक्यात समोर तीरखां आणि बच्चन उठले.

“आता तुला काय वाटतं?” ते पाहून घाईघाईने ज्योतिप्रसादने विचारले.

“हे दोघे आजच मरणार आहेत.”

“दोघे?”

“बच्चन आणि तीरखां.”

***

“सुदर्शन, मला काहीतरी बंदोबस्त करायला हवा. मी इन्स्पेक्टर आहे. खून होणार आहे हे समजूनही मी गप्प बसलो तर साहेब मला फाडून खातील.”

“हे बघ ज्योती, ह्यांना आता कुणीही वाचवू शकणार नाहीं.”

“सुदर्शन, तू काय बोलतो आहेस?”

“जा तर मग. काय व्यवस्था करायची ती कर,” सुदर्शन आरामात पाय ताणून बसत म्हणाला.

क्षणभर ज्योतिप्रसादने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, आणि दुसऱ्याच क्षणाला झटका बसल्यासारखा तो उठून चालायला लागला. अवघी दोन-चार पावले तो चालला असेल, त्याच वेळी वातावरणात दोन भीषण किंकाळ्या उमटल्या - पहिली जीव तोडून मारलेली किंकाळी, आणि पाठोपाठ अजून एक किंकाळी वातावरण भेदून गेली.

घाबरून इन्स्पे० ज्योतिप्रसाद स्तब्ध उभा राहिला. एकाच वेळी त्रिकूट झेप घेऊन उठले आणि त्यांनी पोर्चकडे धाव घेतली. सर्वात पुढे सुदर्शन होता आणि पाठोपाठ अनिल आणि अजय होते. इन्स्पे० ज्योतिप्रसादही धक्क्यातून सावरला, आणि तोही तिघांच्या मागे धावत सुटला. तिघे पोर्चमधून बाहेर पडून हॉटेल रिट्झच्या कार पार्कच्या मोकळ्या पटांगणात आले, तेव्हा एक टॅक्सी गेटमधून वेगात बाहेर पडत होती.

पोर्च-लाईटमधून बाहेर पडलेल्या प्रकाशात दोघे तडफडताना सुदर्शनला दिसले. धावत सुदर्शन तीरखांजवळ पोचला. तो तडफडत होता. दोन सुरे - अगदी तेच - त्याच्या पाठीत घुसले होते. तो वेदनेने तळमळत होता. गुरासारखा ओरडत होता. कापलेल्या कोंबडीसारखा तो मातीत तडफडत होता. दोन्ही हात मागे घेऊन पाठीत शिरलेले सुरे काढायचा त्याचा प्रयत्न सुरू होता. ते दृश्य जीवघेणे होते. कोणत्याही क्षणी तो मरेल हे सुदर्शनने ओळखले. तरीही तो काही करू शकत नव्हता.

दोनदा वेगाने पाय झाडून तीरखांचे शरीर ताठ झाले. क्षणात ढिले पडले. तीरखां संपला होता.

त्याच्यापासून आठ फुटांवर बच्चन पडला होता. त्याची मरणाच्या आकांताने तळमळ चालली होती. काही क्षणांत त्याला शेवटचा आचका बसला आणि बच्चन संपला.

लंगड्या भालूने अगदी सहज आपल्या बळींचे घास घेतले होते.

***

इन्स्पे० ज्योतिप्रसाद धावत हॉटेलात शिरला. भराभर त्याने फोन करून हेड ऑफिसला खुनाची हकिगत सांगितली. पुढच्या पाच मिनिंटात तीन सायरन जीप्स घोंघावत हॉटेलच्या गेटमधून आत शिरल्या.

“ज्योती, घाई करायला हवी,” सुदर्शन ज्योतिप्रसादजवळ येत म्हणाला.

“काय?”

“भालू त्याचा तिसरा आणि शेवटचा बळी आज रात्रीच उडवणार. अ‍ॅड्० राजसिंह!”

“अशक्य!” ज्योतिप्रसाद ओरडला.

“हे बघ, तू पंचनामा करत बस. मी पुढचं पाहतो.”

“थांब…मीही येतो.”

भराभर इन्स्पे० ज्योतिप्रसादने दोन इन्स्पेक्टर्सना सूचना दिल्या आणि तो त्रिकूटाबरोबर निघाला. बेफाम वेगात तीन गाड्या आणि एक जीप रिट्झच्या गेटमधून बाहेर पडल्या, तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. बांद्रा स्टेशनवर त्यांनी कार्स उभ्या केल्या आणि शेवटची लोकल पकडली. विरारला जाणारी!